मुंबई : कला, नाट्य, संगीत आणि सामाजिक क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीसाठी, ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘मास्टर दीनानाथ’ पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. प्रसिद्ध लेखक सलीम खान, नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.
२४ एप्रिलला मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. प्रतिष्ठित मंगेशकर कुटुंबाकडून दरवर्षी दिले जाणारे हे पुरस्कार सर्वच क्षेत्रांतील कलाकारांसाठी एक आनंदसोहळा असतो. शास्त्रीय नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांना या वर्षीचा संगीत आणि कला क्षेत्रातील ‘मास्टर दीनानाथ’ पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असून लेखक सलीम खान यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदानासाठी दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना ‘दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार’ देण्यात येणार असून ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा ‘वाग्विलासिनी’ हा पुरस्कार प्रसिद्ध लेखक वसंत आबाजी डहाके यांना देण्यात येणार आहे.
भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘सोयरे सकळ’ या नाटकाला, ‘मोहन वाघ’ पुरस्काराने वर्षातील सर्वोत्तम नाटक म्हणून गौरवण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी तालयोगी आश्रमचे पंडित सुरेश तळवळकर यांना ‘आनंदमयी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक विजयकुमार यांना त्यांची संस्था ‘भारत के वीर’साठी सन्मानित केले जाणार आहे. प्रतिष्ठानने या वेळी हा पुरस्कार पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित करण्याचे ठरवले आहे. विशेष बाब म्हणजे सोहळ्यात शहिदांच्या नातलगांना एक कोटी रुपयांचे साह्य देण्यात येणार आहे.
‘सीआरपीएफ’चे महासंचालक विजयकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते यंदा हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृती जपण्यासाठी मंगेशकर कुटुंबामार्फत ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा’ आयोजित केला जातो. त्यात विविध क्षेत्रांत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाते.
‘आम्ही करत असलेल्या या कार्याला लोकांचा भरभरून पाठिंबा मिळतो, तसेच मोठ्या प्रमाणात सहकार्यही मिळते’, अशा भावना पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी व्यक्त केल्या आहेत.